ऊस उत्पादन वाढीसाठी ’एआय’चा वापर स्वागतार्ह   

’काटामारी रिकव्हरी’ चोरीबद्दल मात्र पवार काका पुतण्यांचे दुर्लक्ष

पुणे : राज्य सरकार एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर भर देत ऊसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पवार-काका-पुतण्यांनी विशेष लक्ष देऊन राज्यातील सर्व साखर कारखानदारांना एकत्र करून पुढील हंगामापर्यंत हा प्रयोग संपूर्ण राज्यभर यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शेतकर्‍यांनी उसाचे उत्पादन वाढविल्यानंतर कारखानदार काटामारी व रिकव्हरी  चोरून शेतकर्‍यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत पवार काका-पुतणे मूग गिळून का गप्प आहेत. असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त सिद्धराम  दालिमट यांच्या बैठकीनंतर केली.
 
राज्य सरकारने एआय तंत्रज्ञानासाठी ५०० कोटी रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली. शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान दिले पाहिजे. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे. यामध्ये दुमत नाही. यासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करीत आहेत. ते स्वागतार्ह आहे. राज्यातील कारखानदारांनी गाळप क्षमता वाढविली. मात्र, उसाचे तेवढेच क्षेत्र राहिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात ऊस कमी पडू लागला आहे. यावर्षी सर्वच कारकान्यांनी गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी ऊस गाळप केला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम होऊन प्रक्रिया खर्चात वाढ होत आहे. राज्यातील कारखानदारांना माहित होते की उसाचे क्षेत्र तेवढेच आहे तरीही, हव्यासापोटी संगनमताने गाळप क्षमता वाढविली आहे. याचा परिणाम कारखान्यांच्या उत्पादन खर्चावर होऊन उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे.
 
राज्य सरकार व कारखानदारांचे शेतकर्‍यांचे बेगडी प्रेम असून, खरच जर त्यांना शेतकरी हित जोपासायचे होते, तर उच्च न्यायालयाने एक रकमी एफआरपीचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नव्हती. साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी राज्य सरकार व कारखानदार मिळून एआय तंत्रज्ञानावर भर देत आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्व कारखानदार सर्रास काटामारी व रिकव्हरी  चोरी करू लागले आहेत. याबाबत अनेक वर्षांपासून मागणी करूनही राज्य सरकारकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही. 
 
ज्या तत्परतेने कारखाने एआय तंत्रज्ञानासाठी झटत आहेत. त्याच तत्परतेने काटामारी व रिकव्हरी चोरी थांबविल्यास शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. अन्यथा रात्र-दिवस रक्ताचं पाणी करून पिकवायच आणि कारखानदारांनी शेतकर्‍यांनी लुटायचे हे आता चालणार नाही.साखर कारखान्यांच्या काटमारी व रिकव्हरी चोरी बाबत पवार काका-पुतण्यांनी कधी भाष्य केले नाही. जर एआय तंत्रज्ञानाचा वापर काटमारी व रिकव्हरी चोरीवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर अजून वाढला असता, असेही शेट्टी म्हणाले.

Related Articles